Friday, April 22, 2011

कॅरी मी डाउन


जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे घरातील नाते-संबंध बिघडतात.तो आपल्या आईचा
खून करण्याचा प्रयत्न करतो. त्याची रवानगी सुधारगृहात होते.
पौगंडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा कौशल्यपूर्ण प्रयत्न!...


जॉन इगन या बाराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मुलाला आपल्यातील अचाट शक्तीची जाणीव होते.
ती म्हणजे लोकांनी केलेले 'असत्य-कथन' शोधून काढण्याची...
या अचाट शक्तीच्या आधारे जॉन आपले नाव 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदविण्याचा प्रयत्न करतो...

पौंगडावस्थेतील जॉनच्या अशा वागण्यामुळे घरातील नातेसंबंध बिघडतात...
त्याचे वागणे इतके पराकोटीला पोहचते की, तो आपल्या आईचा खून करण्याचा प्रयत्न!... करतो...
त्यातून त्याची रवानगी सुधारगृहात होते... ...एवढं सगळं घडतं ते जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे...
या अवस्थेतील म्हणजे पौंगडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा केलेला कौशल्यपूर्ण प्रयत्न!...
मूळ लेखक : एम. जे. हायलंड
अनुवादक : पुलिंद सामंत



पृष्ठे : 251 किंमत : 250

Wednesday, April 20, 2011

भारतात विकिपिडिया


जानेवारीत विकिपिडियाने आपल्या दहाया वर्धापनदिनाचा मुहूर्त साधून अमेरिकेबाहेरचे आपले पहिले कार्यालय सुरू केले
तेही भारतात. या घटनेचे महत्त्व खूप मोठे आहे.

दीड कोटी लेख किंवा नोंदी असणारा विकिपिडिया हा आॅनलाइन ज्ञानकोश म्हणजे गेल्या दशकातले एक आश्चर्य आहे. शासनाच्या निधीच्या बळावर मराठीत विश्वकोशाच्या निर्मितीचे काम गेली पन्नास वर्षे चालू आहे,
ते अजूनही पूर्णत्त्वाला गेलेले नाही आणि आधी प्रसिद्ध झालेल्या खंडातील माहिती तीस-चाळीस वर्षे लोटल्याने
कालबाह्य झाल्यामुळे नोंदींमध्ये भर घालण्याची गरज असूनही त्याबाबत फारसे काही घडतेय असे दिसत नाही.

या पाश्र्वभूमीवर केवळ दहा वर्षात दीड कोटी नोंदी असणारा आॅनलाइन ज्ञानकोश आणि त्यातील नोंदींच्या नूतनीकरणाची
वा पुनर्लेखनाची अविरत चालू असणारी प्रक्रिया यांचे अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. या ज्ञानकोशाला कुठल्याही देशाच्या शासनाचा निधी मिळत नाही, नोंदींचे लेखन करणाऱ्या लेखकांना किंवा त्यांचे संपादन करणाऱ्याना कसलेही मानधन मिळत नाही तसेच या ज्ञानकोशातील नोंदी बघण्यासाठी कोणालाही शुल्क द्यावे लागत नाही,
आणि केवळ इंग्रजीपुरताच हा ज्ञानकोश मर्यादित नाही तर 260 भाषांमध्ये हा उपलब्ध आहे.
या सर्वच बाबी आपल्याला आश्चर्याचे धक्के देणाऱ्या आहेत.
जगातील सर्व माहिती प्रत्येक भाषेत उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट पुढे ठेवून विकिपिडियाचा आरंभ झाला
आणि कुठलीही सेन्सॉरशिप न लादता वाचकांसाठीच यातील नोंदी लिहाया, दुरुस्त कराया, निर्दोष व परिपूर्ण कराया
अशी मुभा आरंभापासूनच देण्यात आली आहे. हा ज्ञानकोश कोणालाही मुक्तपणे वापरता यावा,
आर्थिक फायद्याचा हेतू त्यामागे नसावा, त्यामुळे त्यात जाहिराती घेऊ नयेत असाही कटाक्ष
त्याच्या संस्थापकांनी आरंभापासून धरलेला आहे. विकिपिडियाला आज चाळीस कोटीवर लोक भेट देतात.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर या दोन तरुणांनी इ. स. 2001 मध्ये विकिपिडियाद्वारे माहितीचे दालन खुले केले.
आपल्या कल्पनेला असे यापक स्वरूप लाभेल, कोट््यवधी लोकांचे सहकार्य त्यासाठी लाभेल असे त्यावेळी त्यांना
स्वप्नातदेखील वाटले नसेल. `एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाछसारख्या प्रकल्पासाठी प्रचंड यंत्रणा राबत असते
आणि त्याची आर्थिक उलाढालही अवाढय असते. स्वत:जवळ फारसे पैसे नसताना
आॅनलाइन एनसायक्लोपिडियाचा उपक्रम हाती घेणे हा एका दृष्टीने अयापारेषु यापारच होता.
या ज्ञानकोशातील नोंदींखाली ती लिहिणाऱ्याचे नाव टाकायचे नाही किंवा लेखनाबद्दल मानधनही द्यायचे नाही
असा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आरंभी अनेक हितचिंतकांनी आक्षेप घेतला.
नाव नाही, पैसा नाही, मग नोंदी लिहायला कोणी तयार होणार नाही असे अनेकांना वाटले.
परंतु हे आक्षेप आणि शंका फोल ठरल्या. नोंदी लिहायला हजारो हौशी तसेच जाणकार लोक पुढे आले.
अल्पावधीतच हजारो नोंदी विकिपिडियावर उपलब्ध झाल्या आणि त्यांचा संदर्भासाठी वापर करणाऱ्याची संख्याही वाढू लागली. नोंदींमध्ये काही सुसूत्रता आणि शिस्त असावी या दृष्टीने आरंभापासून काही पथ्ये पाळण्यात आली.
नोंदींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी संपादक सूचना करू लागले. संदर्भात नेमकेपणा असावा यासाठी दक्षता घेण्यात आली.
दहा वर्षाच्या अवधीत दीड कोटी नोंदींचा डोंगर उभा राहिला. मानवी इतिहासातला सर्वात मोठा ज्ञानकोश सिद्ध झाला.
तो सतत वर्धिष्णू राहावा, ताजा अद्ययावत राहावा अशी यंत्रणा कार्यरत झाली.
एकूण 260 भाषांमध्ये आणि भारतातील 20 भाषांमध्ये विकिपिडियाचा व्याप वाढू लागला.

इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान भक्कम करीत राहण्याची प्रक्रियाही भारतात वेग धरीत आहे.
त्यामुळे विकिपिडियाला भारतात आपली शाखा उघडण्याची गरज भासली. जानेवारी 2011 मध्ये विकिपिडियाने
आपला दहावा वर्धापन दिन भारतात साजरा केला आणि आपल्या पहिल्या ओहरसीज कार्यालयाचा शुभारंभ केला.
`विकिमिडिया डॉट इनछ हे संकेतस्थळ कार्यान्वित केले गेले.

भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अत्यंत भक्कम आहे त्याचप्रमाणे विविध मनमतांतरांचा आदर करण्याची
आणि परस्पर संवाद साधण्याची प्रदीर्घ परंपरा भारतात भाषिक विविधतेचे आणि स्वागतशील मानसिकतेचे आकर्षण वाटते
असे संस्थापक जिमी वेल्सने म्हटले आहे. त्यामुळेच भारतात आपले अधिकृत केंद्र विकिपिडियाने सुरूकरण्याचा
निर्णय घेतला. दहाया वर्धापनदिनाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये 97 ठिकाणी विकिपिडियाचे कार्यक्रम झाले.
विकिपिडियासाठी एखाद्या विषयावर निबंध लिहिण्याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात कलकत्त्याच्या
जादवपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. इंग्लिश साहित्य हा विषय एम.ए.साठी घेणाऱ्या विद्यर्थ्यांना
विकिपिडियासाठी एक निबंध लिहावा लागतो. त्याचे मूल्यमापन त्यातील संशोधन, आशय आणि नावीन्य या निकर्षावर केले जाते. तेथील बहुसंख्य विद्यार्थी विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी आणि संदर्भ मिळवण्यासाठी
विकिपिडियाचा वापर करतात, असे आढळून आले आहे. विकिपिडिया या एकमेव साधनावर अवलंबून राहणे
आणि त्याची कॉपी करणे हे जर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू लागले तर तेही गैरच ठरेल.
त्यामुळे विकिपिडियाबाहेरचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न चोखंदळ आणि हुशार विद्यार्थी करतात
आणि आपले वेगळेपण प्रकट करतात असाही अनुभव येतो.

विकिपिडियामुळे इंग्रजी भाषेप्रमाणेच जगातील प्रमुख भाषांमध्येही आॅनलाइन ज्ञानकोश निर्मितीला चालना मिळाली आहे. इंग्लिशमधील 30 लाख लेख विकिपिडियावर आहेत, त्याचप्रमाणे जर्मन, फ्रेंच, इटालियन स्पॅनिश या भाषांमध्येही
प्रत्येकी सुमारे 10 लाख लेख आहेत. भारतातील 20 भाषांना विकिपिडियामध्ये स्थान मिळाले आहे.
त्यात हिंदी, भोजपुरी, सिंधी, मराठी, तामिळ, तेलगू, कानडी वगैरे भाषांचा समावेश आहे.
आश्चर्य म्हणजे काही बोलीभाषांचेही भाग्य विकिपिडियामुळे उजळले आहे. त्यांना जीवदान मिळाले आहे.
बिहारमधील प्राचीन आंगिका ही बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.
परंतु विकिपिडियात त्या भाषेतील काही नोंदी आंगिकाचे पुरस्कर्ते करूलागले आहेत आणि तिचा वापर वाढू लागला आहे.
एकीकडे जागतिकीकरणामुळे आणि इंटरनेटमुळे इंग्रजी वगैरे भाषांचा वापर वाढून बऱ्याच भाषांचा प्रभाव कमी होत आहे तर दुसरीकडे फारशा प्रचलित नसलेल्या बोलीभाषा वा छोट््या प्रादेशिक भाषा कात टाकून नया परिवेशात पुढे येत आहेत.

भारतात विकिपिडियामुळे विविध विषयां बद्दललची माहिती सुलभपणे उपलब्ध होईल हे तर स्पष्टच आहे, पण त्याबरोबर वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये संदर्भबहुल बीजग्रंथांचा अभ्यास होऊ लागेल. ज्ञानभाषा म्हणून त्यांची क्षमता विकसित होत राहील. लोकसाहित्याचे संकलन तसेच बोलीभाषांचे संवर्धन अधिक साक्षेपाने होऊ लागेल. पुस्तकांपेक्षा दृकश्राय माध्यमामुळे लोकसाहित्य आणि बोलीभाषा यांचा अभ्यास आणि प्रसार अधिक सहजतेने होऊ लागेल.

तामीळ विकिपिडियात इ.स 2003 पासून आजवर 25 हजार लेखांची भर पडली आहे. या लेखांचे लेखन वा अनुवाद
सुमारे 250 उत्साही यक्तींनी केले आहे. दररोज एक लाखावर अभ्यासक त्याचा लाभ घेतात.
जून 2010 मध्ये तामीळनाडू सरकारने महाविद्यालयीन विद्याथ्या|साठी तामीळ विकिपिडियासाठी एक लेखस्पर्धा आयोजित केली होता. स्पर्धेतील 2000 लेखांपौकी 1200 लेख विकिपिडियासाठी निवडण्यात आले.
त्याचप्रमाणे दीड लाख तामीळ शब्दांचा समावेश असणार्या शब्दकोशाची सीडी तामीळनाडू सरकारने वितरित केली.
त्याशिवाय 500 लेखांची विकी सीडी तयार करून तामीळनाडूमध्ये विकिपिडियातर्फे वाटण्यात आली.
एका संगणकाभोवती विद्यर्थ्यांना जमा करून या सीडीतले लेख वाचून दाखवले जातात. संगणक व इंटरनेट सेवा मर्यादित असल्याने विकिपिडियाचा वापर अशा क्लासेसद्वारे यापक पातळीवर होऊ शकतो.
केरळमध्येही तेथील सरकारच्या पुढकाराने अशीच सीडी तयार करून 60 हजार शिक्षकांना संदर्भासाठी पुरवण्यात आली आहे. मल्याळी भाषेत उपलब्ध नसलेल्या विविध विषयांवरील माहितीचा खजिना या सीडी द्वारे शिक्षकांना आणि विद्यर्थ्यांना सहजगत्या हस्तगत होऊ शकते.

आपापल्या भाषेत विकिपिडियाचा भक्कम पाया घालण्यासाठी स्वयंस्फूर्तीने लेखन-संपादन करणाऱ्या व्यक्तींच्या संघटना आता स्थापन होऊ लागल्या आहेत. पुणे, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, कलकत्ता येथे संपादकांचे गट तयार झाले असून,
नियमितपणे एकत्र येऊन नवनया विषयांवरचे लेखन मिळवण्यात येते. विकिपिडियासाठी संपादन कसे करावे याचे
प्रशिक्षणही अशा कार्यशाळांमध्ये देण्यात येते!

`विकिअॅकडमी, विकिएक्सपर्ट असे नवे शब्दही त्यामुळे प्रचारात येत आहेत. एनस्लायकोपिडीया ब्रिटानिकासारखे ज्ञानकोश हजारो रुपये खर्च करून संग्रही बाळगणे फार थोड्या लोकांना परवडते. विकिपिडियामुळे ब्रिटानिकापेक्षाही अधिक नोंदी असणार्या आॅनलाइन ज्ञानकोशातील माहिती कसलीही धावपळ न करता तीस सेकंदाच्या आत बसल्या जागी मिळवता येते. मिळू शकते. विकिपिडियाने माहितीचे संकलन आणि वर्गीकरण, माहितीची उपलब्धता आणि अद्ययावतता याबाबत अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे भारतात कार्यालय उघडून विकिपिडिया भारतीय भाषा आणि प्राचीन भारतीय ग्रंथसंपदा आणि संस्कृती यांना नवा उजाळा देऊ शकेल. मराठीसाठीही विकिपिडिया हे एक वरदान ठरू शकेल.

-सुनील मेहता

Tuesday, April 19, 2011

ए रशियन डायरी


अॅना पोलितकोवस्क्या एक निर्भिड पत्रकार 2003 ते 2005 च्या अखेरपर्यंत,
रशियात भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणूका,
बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ,
चेचन्याची शोकांन्तिका



ब्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणाऱ्या आणि हादरवून टाकणाऱ्या सत्यांना
अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे,
त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मारून टाकणारच होतं
आणि एका प्रकारे ती एवढे दिवस जगली, हाच एक चमत्कार म्हणावा लागेल!
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तर ही म्हणावी लागेल की, सोव्हिएतनंतरच्या अस्थिरतेच्या काळात
एक अशी पत्रकार उभी राहिली, जिने जवळजवळ एकहाती चेचन्याची कुप्रसिद्ध दु:खान्तिका,
तसंच आधुनिक रशियाची गैरकृत्यं जगाच्या नजरेसमोर आणली. राजकीय आणि
मानवी हक्कांची व्यवस्थेतच मोठ्या प्रमाणावर घडून आलेली पायमल्ली,
याचा तिने बुरखा फाडला आणि
'रशियन डायरी'त केलेल्या नोंदीतून तिने ते काम सुरूच ठेवलं.
हीच ती डायरी,
डिसेंबर 2003 ते 2005च्या अखेरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणुका आणि
बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ यांच्या नोंदी ठेवणारी!
अॅना पोलितकोवस्क्याला जगू देण्यात आलं नसतं,
याची जणूकाही भविष्यवाणीच तिची 'ए रशियन डायरी' वाचताना झाल्यासारखी भासते.
तिच्या मॉस्को येथील अपार्टमेंट ब्लॉकच्या जिन्यात,
सुपारी घेऊन एका भाडोत्री मारेकऱ्याने केलेली तिची भयानक हत्या घडल्याचं तुम्हाला ठाऊक असल्याने
तिचा हा शेवट अटळ होता, हे प्रकर्षाने जाणवतं.


मूळ लेखक : अॅना पोलितकोवस्क्या
अनुवादक : शोभना शिकनीस


पृष्ठे : 318
किंमत : 300

यशस्वी सर्जनची ‘सर्जनशील’ वाटचाल



-अभय जोशी


मना सर्जना-डॉ. अनिल गांधी
गेल्या काही वर्षांत समाजाच्या विविध घटकांतील मान्यवर व्यक्तींनी मराठी साहित्यात आत्मचरित्रांच्या रुपाने आपल्या अनुभवांची भर घातली आहे. एकेकाळी केवळ लेखक अथवा साहित्यिकांपुरतेच मर्यादित असलेले साहित्य, त्यातही आत्मचरित्रांचे दालन सर्वासाठी खुले होऊ लागले. जाणत्या तसेच सर्वसामान्य वाचकांनीही त्यास लक्षणीय प्रतिसाद दिला, ही बाब उल्लेखनीय ठरते. पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर अनिल गांधी यांचे अलीकडेच प्रसिद्ध झालेले ‘मना सर्जना’ हे आत्मचरित्र असेच वेधक आणि सरस ठरले आहे.
डॉ. गांधी यांचे ‘मना सर्जना’ वाचताना ठळकपणे जाणवतात त्या दोन बाबी. एक म्हणजे डॉक्टर होण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच बांधलेला चंग आणि त्या अनुषंगाने केलेले प्रयत्न.
खरे म्हणजे, डॉक्टर गांधी यांचे वडील सोलापूरमध्ये शाळाशिक्षक होते. सुमारे सात दशकांपूर्वी त्या काळातील कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये असलेलीच जेमतेम आर्थिक परिस्थिती गांधी कुटुंबियांची होती. घरातील सदस्यांचा वाढता पसारा.
परंतु घराला कोणतीही वैद्यकीय पाश्र्वभूमी नसतानाही लहानगा अनिल डॉक्टरकीचा ध्यास धरतो आणि पुढे मोठेपणी त्या दिशेने यशस्वीरीत्या प्रयत्न करून डॉक्टर, सर्जनही होतो.
आपल्याला डॉक्टरकीचे वेध का लागले, याची कारणीमीमांसा करताना त्या काळामध्ये एकूण गरिबी असूनही समाजात असलेला सेवाभाव कसा महत्त्वपूर्ण ठरला, याचे दाखले डॉक्टरांनी आपल्या या वाटचालीची कथा सांगताना या पुस्तकाद्वारे दिले आहेत. डॉक्टर गांधी यांनी आपल्या या पुस्तकात त्यांना सर्व प्रकारची मदत करणारे त्यांचे मित्र, व्यावसायिक सहकारी, अन्य ज्येष्ठ डॉक्टरवर्ग यांचे ऋण मनमोकळेपणाने मान्य केले आहे. हे सर्वजण त्या त्या काळात आपल्याला भेटले नसते आणि त्यांनी आपल्याला सहाय्य केले नसते तर आजचे ‘डॉ. अनिल गांधी’ कदाचित बघायला मिळाले नसते, याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दाखले या पुस्तकामध्ये आपल्याला अनेकदा वाचायला मिळतात.
डॉ. गांधी यांनी आज वयाची सत्तरी पार केली आहे आणि ज्या काळात त्यांनी डॉक्टरीचा नेटाने अभ्यास करून आजचे स्थान मिळविले, तो काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती निश्चितच वेगळी होती. आजच्यासारखी ‘कट-फी’, अनावश्यक चाचण्या, असा प्रकार त्या काळात कदापि नव्हता. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना केवळ नित्याचीच नव्हती तर त्या काळातील डॉक्टर एखाद्या ‘फॅमिली फ्रेण्ड’ प्रमाणे आपल्या रुग्णांच्या घरचे निकटचे मित्रच होते. त्या काळात डॉक्टर आपल्या रुग्णांच्या घरगुती समस्यांवरही तोडगा काढीत असत. आपल्या रुग्णांची नातेवाईकांप्रमाणे काळजी घेण्याबरोबरच त्याला धीर देऊन त्याचा आजार दूर करण्यासाठी एखाद्या निष्णात सर्जनाप्रमाणे शरीराबरोबरच त्याच्या मनावरही यशस्वी उपचार केल्याची उदाहरणे या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. ‘चालला..लमाणांचा तांडा’ या प्रकरणात डॉक्टरांनी आपल्या डॉक्टरकीच्या वाटचालीतील अनेक रुग्णांच्या कथा नावानिशी दिल्या आहेत. ‘लमाणांचा तांडा’ याच प्रकरणात जिन्यातून उलटय़ा दिशेने येणाऱ्या आजीबाईंचा डॉक्टरांनी सांगितलेला किस्सा आपल्याला नकळत हसवून जातो. पुण्यात डॉक्टरकी केल्यामुळे पुणेकरांचे काही ‘अस्सल’ अनुभवही डॉक्टरांना आले. अर्थात ते फार कमी असल्याचेही डॉक्टर नमूद करतात. सध्या गाजत असलेल्या ‘स्वेच्छामरणा’च्या विषयावरही याच प्रकरणात डॉक्टरांनी आपले मत थोडक्यात पण अत्यंत नेमकेपणाने मांडले आहे. प्रारंभीच्या पहिल्या प्रकरणातील मंजुश्री सारडा प्रकरणात आलेले अनुभव डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहेत.
वरती म्हटल्याप्रमाणे डॉक्टर गांधी यांना आपले इप्सित साध्य करण्यासाठी अनेक संकटे, कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्यामधून त्यांनी यशस्वीपणे मार्गही काढले. हे करताना डॉक्टरांनी अडचणीच्या परिस्थितीचा बाऊ केला नाही, हे महत्त्वाचे ठरते. आजकाल परीक्षेत कमी मार्क मिळण्याच्या भीतीमुळे आत्महत्येचा वाईट मार्ग अनुसरणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे, असे सुचवावेसे वाटते. या पुस्तकातील शेवटचे मी ‘सर्जन’शील..? हे प्रकरण गांभीर्याने वाचावे असेच आहे. त्या काळातील सामाजिक भान, दुसऱ्यांना मदत करण्याची एकूण वृत्ती, त्यासंदर्भात डॉक्टरांना जाणत्या वयात आलेले अनुभव आणि विवाहानंतरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी वर्षां यांनी दिलेले निरपेक्ष सहकार्य, आदी मुद्दय़ांचा डॉक्टरांनी अत्यंत मनमोकळेपणाने ऋणपूर्वक उल्लेख केला आहे. ध्येयपूर्तीसाठी प्रसंगी घरातल्या जवळच्या व्यक्तींना आपण अनेकदा दुखावल्याची खंतही डॉक्टरांनी प्रांजळपणे व्यक्त केली आहे. या पुस्तकात डॉक्टर गांधी यांनी आपला व्यवसाय संभाळून आश्रमशाळा, आर्थिक गुंतवणूक, आदी क्षेत्रांतही योगदान दिले आहे.
‘सर्जन’ या शब्दाचा मराठी अर्थ शल्यचिकित्सक असून मराठी साहित्यातील ‘सर्जनशील’ अथवा ‘सृजनशील’ या शब्दाचा अर्थ निर्मितीशी येतो. त्यामुळे व्यवसायाने ‘सर्जन’ असलेल्या डॉ. गांधी यांनी ‘मना सर्जना’ या आत्मकथनात्मक पुस्तकाद्वारे आपल्यातील ‘सर्जनशील’ लेखकही तितक्याच यशस्वीपणे रंगविला आहे.

मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : २२०
मूल्य : २०० रुपये

(लोकसत्ताच्या लोकरंग य़ा रविवारच्या १७ एप्रिल २०११ च्या अंकात `मना सर्जना`
पुस्तकाचे परिक्षण आले आहे , ते येथे देत आहोत .)

Sunday, April 17, 2011

पुस्तक तुमच्याशी बोलते-राहूल सोलापूरकर



बॅंकेच्या समृध्द जिवन अनुभवातून लिहलेले आनंदाचे पासबुक हे पुस्तक तुमच्याशी बोलते. सामाजिक क्षेत्रातले, संगीतातले,नाटकातले लोक आणि त्याच्यांबरोबरचे संबंध यातून श्याम भुर्के यांनी जे लिहले आहे ते वाचकांनी वाचावे असेच आहे, असे मत अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केले.

मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केलेल्या श्री. श्य़ाम भुर्के यांच्या आनंदाचे पासबुकचे प्रकाशन राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. शनिवारी (१६ एप्रिल) अक्षरधाराच्या बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर संगीतकार आनंद मोडक यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ रंगतदार झाला.

राहूल सोलापूरकरांची खंत एकच होती की भुर्के यांनी ब-याच माणसांवरचे अनुभव त्रोटक स्वरूपात लिहले आहेत. अजुन त्यातल्या प्रत्येकाच्या ब-याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यांच्या मते आयुष्यातल्या कटू अनुभवांना फाटा देऊन क्रेडिट देणारे आनंदाचे क्षणच या पुस्तकात भुर्कें यांनी टिपले आहेत. माणूस शिकतो ते दुःखात ते अनुभवही वाचकांना वाचायला आवडतील. त्यांच्या या मैफलीत केवळ आनंद भारलाय. साताराहून पुण्यात आलेला हा लेखक या रुपाने वाचकांच्या हाती सातारी कंदी पेढाच देतो आहे ही भावना आपल्या मनाला स्पर्शून गेली, असेही सोलापूरकर म्हणतात.

आपण जणू मित्रांशी गप्पा मारतोय अशा रसरशीतपणे जिवंत अनुभव देत त्यांचे लेखन झाल्याचे संगीतकार आनंद मोडक सांगतात. एकदा पुस्तक वाचायला घेतल्यावर ते आणखी वाचावे असे वाटते. ज्ञान सतत मिळवत रहाणे, सातत्याने विद्यार्थीपण जपत रहाणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. भुर्के जसे जगले ते विलक्षण आहे. तेही निष्ठेने. यात लेखक, वाचक, रसिक आणि सामाजिक भान सर्वांचा प्रत्यय येतो. साहित्य ही तुमची आमची भूक आहे. त्यातल्या अनुभवावरच आयुष्य उलघडत जाते. भुर्के यांचे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टी देईल, असा विश्वास मोडक यांनी व्यक्त केला.

श्याम भुर्के यांच्या मते सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलने मराठी साहित्याचा ओढा आपल्या मनात लहानपणी निर्माण केला. शाळेतल्या विविध उपक्रमातून भाग घेऊन बळ आले. तेच बळ घेऊन पुण्याला आलो. बॅंक ऑफ महाराष्ट्रने समृध्द जिवन घडविले. त्यातूनच आलेल्या अनुभवांतून ह्या ६० वयापर्यतच्या आठवणी...एका अर्थाने आत्मवृत्त आनंदाचे पासबूक या पुस्तकातून लिहण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे ते सांगतात.
मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनिल मेहता यांनी भुर्केयांच्या पुस्तकाचे वेगळेपण सांगितले.
तर अक्षरधाराचे लक्ष्मण राठीवडकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष इनामदार यांनी केले होते.

Wednesday, April 13, 2011

मंद्र कादंबरीला -सरस्वती सन्मान




कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध...




त्यांच्या मंद्र या पुस्तकाला बिर्ला- सरस्वती सन्मान जाहिर झाला आहे .
मूळ कन्नड़ भाषेतली ही कादंबरी मराठीत मेहता पुब्लिशिंग हाउस यानी प्रकाशित केली आहे. .
उमा कुलकर्णी यानी मराठीत या कादंबरीचा अनुवाद केला आहे. त्यातलेच हे एक प्रकरण ....



तुळशीच्या दाट झुडपांमधोमध असलेली रिकामी जागा. उजवीकडे यमुना. देवळात स्वामी हरिदासांची मूर्ती. देवळात यात्रेकरूंचा गडबड-गोंधळ नहता. बाहेरच्या जगात तानसेनचे गुरूम्हणून प्रसिद्धी पावलेल्या गुरूच्या मंदिरात शिष्याच्या नावाला महत्त्व नहतं. इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असते, तशीच वृंदावनातही यात्रेकरूंची गर्दी होती. पंड्यांची दादागिरी होती. अनेक वस्तू विकणाऱ्याचं आक्रमण होतं. त्यामुळे मोहनलालला या देवळात खूपच शांत वाटलं. तासभर बसून राहिला. नंतर जवळच्या हॉटेलमध्ये आपल्या खोलीवर जाऊन झोपला. सकाळी यमुनेच्या काठावर गेला. तिथं कृष्णानं या झाडावर गोपींची वस्त्रं लपवून ठेवली होती, म्हणून सांगण्यात येणार्या झाडाभोवती फिरून आला. तो दिवस तसाच गेला.
तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे जाग आली. घड्याळ पाहिलं. साडेतीन वाजले होते. हरिदास मंदिराकडे जायची इच्छा झाली. तोंड धुऊन तो अंधारातच बाहेर पडला. देवळापाशी येताच त्याला स्वर ऐकू आले. कुणीतरी देवळात स्वरसाधना करत होतं. क्षणभर वाटून गेलं, हरिदास स्वामींचा आत्मा तर नसेल? पावलांचा आवाज न होऊ देता देवळाजवळ जाऊन तो तिथल्या चौथऱ्यावर बसला. आत खरोखरच कुणीतरी स्वरसाधना करत होतं. त्याचीही एक विशिष्ट पद्धत दिसत होती. तिथं स्वर आकार किंवा स्वरांच्या सरगमनुसार नहता. दीर्घ ओंकार विशिष्ट सुरात लावून ती साधना चालली होती. एकेक ओंकार नाभीतून निघून मस्तकात भिनण्याइतका दीर्घकाळ चालला होता. षड्जापासून सुरुवात करून बाराही स्वरांवर स्थिरावत, प्रत्येक स्वराचा दीर्घ ओंकार चालला होता. मंद्र षड्जाला पोहोचल्यानंतर एकेक स्वर ओंकारात लावत, बाराही स्वरांनंतर मध्य सप्तकातील षड्जाला येऊन पोहोचत होता. तिथून मध्य सप्तकाचे बाराही स्वर अशाच प्रकारे घेतले जात होते. त्यानंतर तार सप्तकातील बारा पायऱ्या. अशा प्रकारे मंद्र षड्ज ते तार षड्ज आणि तार षड्ज ते पुन्हा मंद्र षड्ज असं आवर्तन पुरं करताना बहात्तर ओंकार झाले. प्रत्येक स्वर पक्का होता. इतका की तिथं स्वरांच्या अतिक्रमणाला वाव नहता, तशीच स्वरसंकोचालाही जाग नहती. श्वासाच्या दमदारपणातही किंचितही भेदाभेद नहता. प्रत्येक स्वर किमान मिनिटभर तरी होता असं धरलं तरी एका आवर्तनाला बहात्तर मिनिटं लागली असली पाहिजेत. त्यांनी या आवर्तनांना केहा सुरुवात केली आणि हे कितवं आवर्तन याची मोहनलालला कल्पना नहती. पहाट व्हायच्या वेळी त्यांनी आपली स्वरसाधना संपवली. त्यानंतर संपूर्ण मौन! हा शुद्ध स्वरांचा क्रम. यात कुठलाही विशिष्ट राग दिसत नहता. सगळ्या रागांना आधारभूत असणार्या सगळ्या स्वरांची ती साधना होती.
संगीताच्या खोलीचा प्रत्यय आला आणि पाठोपाठ राजासाहेबांच्या शिवमंदिरात करत असलेल्या स्वरसाधनेची आठवण आली.
नाही! त्याहीपेक्षा ही ओंकाराची स्वरसाधना अधिक गहिरी आहे!
सूर्योदय झाला. सगळा परिसर सूर्यकिरणांनी भरून गेला. एवढा वेळ नादसाधना करणारे गर्भगृहाबाहेर आले. ते एक साधू होते. काळ्या केसांच्या जटा वळल्या होत्या. चाळिशीचं वय असेल. कमरेला एक जुनं तोकडं वस्त्र काचा मारून आवळलं होतं. कपाळावर लावलेलं गंध सुकून पडून गेलं होतं.
त्यानं पटकन उठून त्यांचे पाय धरले. नासिकेवर एकाग्र झालेली त्यांची नजर त्याच्याकडे वळली. मोहनलालला काय बोलावं ते सुचलं नाही. ते निघून गेले. कुठं गेले ते जाऊन पाहायची त्यालाही इच्छा झाली नाही.
तो संपूर्ण दिवस मोहनलाल त्या ओंकार स्वरांतच बुडून गेला होता. आपण करत असलेल्या मंद्र-साधनेपेक्षाही अधिक गहिरी आणि अतीताचं दर्शन घडवण्याइतकी सधन आहे त्यांची स्वरशक्ती! अंथरुणावर पडलं तरी त्याला झोप येईना. रात्री लवकर जेवण करून तो झोपला. झोप लागली; पण मध्यरात्री कानांमध्ये ओंकार नाद भरल्यासारखा होऊन जाग आली. घड्याळ पाहिलं, साडेबारा वाजले होते. तो उठला, डोळ्यांना पाणी लावून हरिदास मंदिराच्या दिशेनं चालू लागला. आकाशात फिकट चांदणं होतं. अंधारात आजच यापारी वृत्तीनं सडलेलं वृंदावन नष्ट होऊन त्या फिक्या उजेडात मूळ वृंदावनाचा भास निर्माण होत होता. यमुना, कृष्ण, राधा, गोप-स्त्रियांचा रास, कृष्णाची बासरी सारं काही मन:चक्षूंपुढे साकार झाल्याचा अनुभव येत होता. तसाच तो तुळशीच्या झाडांमधल्या देवळापाशी जाऊन पोहोचला, तेहा तर ती दृश्येही नाहीशी झाली आणि वातावरणात भरून राहिलेल्या शुद्ध ओंकाराचा अनुभव आला.
म्हणजे यांची स्वरसाधना रात्रभर चालते तर! तो पुन्हा हलक्या पावलांनी कालच्याच जागेवर जाऊन बसला. त्यांचा प्रत्येक ओंकार कुठला स्वर सांगतो हे वेगळं सांगायची गरज नहती. क्षणभर त्यालाही त्या स्वरांमध्ये आपला स्वर मिसळण्याचा अनावर मोह झाला, तरी त्यानं ते आवरलं. कारण त्यामुळे त्यांची अतिसूक्ष्म अवस्था भंग पावून ते आपल्यावर संतापतील हे दिसत होतं. त्यामुळे तो मूकपणेच त्यांच्या प्रत्येक स्वर-भावाशी तल्लीन होऊन ऐकू लागला.
आदले दिवशीप्रमाणे पहाटेच्या वेळी त्यांच्या स्वरसाधनेची समाप्ती झाली. थोडा वेळ गर्भगृह मौनानं भरून गेलं. आकाशात सूर्यकिरणे पसरायच्या वेळी ते बाहेर आले. त्यानं आदले दिवशीसारखाच नमस्कार केला. त्यांनी नासिकाग्रावरची दृष्टी त्याच्याकडे वळवून विचारलं, `तुम्ही गायक आहात काय?
होय. माझं नाव मोहनलाल!
मनात आलेल्या ङयंदाचा तानसेन पुरस्कार-विजेताछ ह्या शब्दांचा उच्चार करायचं मात्र टाळलं. क्षणभर वाटलं, आपण योग्यच केलं. केवळ मोहनलाल म्हटलं तरी त्यांना समजेल. गायनाच्या क्षेत्रात हे नाव ठाऊक नाही, असं आहे तरी कोण? पण पाठोपाठ वाटलं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही एवढंच होतं. तिथं नाव सांगायची गरजच नहती. त्या नावाचा त्यांच्यावरही काही परिणाम झालेला दिसला नाही.
काल पहाटे आला होतात. मध्यरात्रीही आलात. निर्जन जागी स्वरसाधना करायची म्हणून मी ही जागा निवडली आहे.
आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमा करा!
असू दे. यानंतर मात्र येऊ नका.
आपली आज्ञा असेल तर मी येणार नाही. आपलं गायन ऐकून मी संगीतातील ज्ञात शक्ती शिकू शकेन, असं वाटलं. म्हणून आलो होतो. माझा शिष्य म्हणून स्वीकार केलात तर मी कृतार्थ होईन!
मी संगीत साधना करत नाही. ही योग-साधनेची एक पद्धत आहे, एवढंच.
तेच म्हणतोय मी. संगीतातली अज्ञात शक्ती मला शिकायची आहे. आपण ती शिकवलीत तर माझ्या गाण्याला नवी शक्ती प्राप्त होईल. तानसेननं दीपक राग म्हणून आग लावली आणि मुलीकडून आणि गुरुभगिनीकडून मेघराग गायला लावून ती विझवली, हे सगळं गुरूनं शिकवलेल्या योग-सामथ्र्यामुळेच ना? आपण कृपावंत होऊन ते सामथ्र्य मला दिलंत तर मी धन्य होऊन जाईन!
त्यानं नतमस्तक होऊन विनंती केली.
ओह! तानसेनच्या संदर्भात गायकांनी रचलेल्या असल्या मंत्र-सिद्धीच्या कथांवर संगीतप्रेमी विश्वास ठेवतात, हे मीही ऐकलं आहे. अकबर बादशहाच्या मोठेपणाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. ही कथाही त्यापौकीच एक आहे. अकबर बादशहा त्या गोष्टीतून बाजूला काढला तर तानसेननं दीपक राग गाऊन केलेली कथाच तयार होऊ शकणार नाही! खरं की नाही?
अगदी खरं आहे ते! बादशहा फार मोठा संगीतप्रेमी! आपल्या इतर मंत्र्यांपेक्षा तानसेनला तो जास्त पगार द्यायचा!
खरी गोष्ट काय आहे, सांगू? स्वामी हरिदासांनी लंकादहन सारंग राग म्हणायला सुरुवात केल्यावर या वृंदावनात त्या वेळी असलेल्या अरण्यात वणवा पेटला. त्या वेळी त्यांनी मेघ गाऊन तो वणवा विझवला. स्वामी हरिदास फक्त गायक नहते. ते फार मोठे योगी होते. योग्याचा पहिला गुण कोणता? अकबर बादशहानं अनेकदा निरोप पाठवूनही त्यांनी याच जागी असलेला आपला आश्रम सोडला नाही आणि ते राजाश्रयासाठीही गेले नाहीत. बादशहाला आपल्या गुरूचं गाणं ऐकवण्यासाठी तानसेननं त्याला वेषांतर करून इथं आणलं होतं. नंतर त्याला बाहेरच बसवून स्वत: आत गेला आणि अमूक राग गायची विनंती केली. बादशहाही बाहेरूनच गाणं ऐकून माघारी वळला. हा गुण तानसेनमध्ये होता काय? त्यानं राजाश्रय स्वीकारला होता ना? बादशहाचा गुणगौरव करणाऱ्या काही संगीतरचना त्यानं केल्या ना? आपल्या मुलांकडूनही त्यानं बादशहाची स्तुती करणार्या रचना करवून घेतल्या, त्या स्वत: तपासून दिल्या आणि त्यांना राजदरबारात मोठ्या पगाराच्या आणि इनामाच्या जागा मिळवून दिल्या. खरं की नाही? त्यानं रचलेल्या रागांमध्येही बादशहाच्या आवडीचा आणि अभिरुचीचा विचारच होता की नाही? आवडलेल्या मुलीशी विवाहबद्ध होण्यासाठी त्यानं आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला होता ना? या धर्माचा स्वीकार केल्यामुळे त्याचं बादशहाच्या दरबारातलं स्थान अधिक बळकट झालं की नाही? तो एक मोठा गायक होता. त्याची कला-प्रतिभा मोठी होती; पण म्हणून केवळ योग्यालाच प्राप्त होऊ शकणारी शक्ती त्याच्या गाण्याला होती असं आपल्यासारखे कलाकारच म्हणतात! तो राजाश्रय आणि राजभोगाची आमिषं यांना बळी पडला, त्यानं स्वधर्माचा त्याग केला. तरीही योगसिद्धी प्राप्त असलेल्या महायोगी हरिदासांनी त्याचा तिरस्कार केला नाही, त्याला शापही दिला नाही! हे त्यांच्या योगसिद्धीचं आणखी एक लक्षण.
ते उभ्यानंच हे बोलत होते. तो काही अंतरावर नम्रपणे उभा राहून ऐकत होता. त्यांनी नजरेनंच विचारलं,
आणखी काही विचारायचं आहे काय?
त्याला काही सुचलं नाही. त्यांची नजर पुन्हा नासिकाग्रावर खिळली. ते नदीच्या दिशेनं चालू लागले. तो त्यांच्या पावलांच्या ठश्यांकडे पाहत उभा होता.
हॉटेलमध्ये परतून अंघोळ-नाश्ता आटोपला. पलंगावर आडवं होऊन विश्रांती घेताना मनात एक प्रकारचं समाधान होतं, पाठोपाठ असमाधानही धावून आलं. तानसेनही माझ्यासारखा एक गायक होता. भरपूर प्रतिभावंत. मला जसा पौसा, कीर्ती यांसारख्या ऐहिक गोष्टींचा मोह आहे, तसा त्यालाही होता. या विचारानं मन थोडं शांतही झालं. अशा प्रकारे भोगामध्ये गुंतलेल्या संगीतानं कसलाही चमत्कार करणं शक्य नाही. मला हे कधीही जमणार नाही, या विचारानं मन अस्वस्थही झालं. बायको-मुलं-शिष्य सर्वच बाबतीत असमाधानी असल्यामुळे, मला जसा खिन्नभाव छळतो, तसा त्याला छळत नसावा!
थोड्या वेळात झोप आली. झोपेतही कानांमध्ये ओंकाराचे स्वरच ऐकू येत होते. त्यानंतर जाग आली. जाग आल्यावरही त्याचं आकर्षण छळू लागलं. आज रात्रीही ते देवळात येतील, ओंकार-साधना करतील. ती ऐकली पाहिजे असं अदम्य आकर्षण वाटत होतं; पण आज गेलं तर ते स्पष्टपणे जायला सांगतील! तरीही हट्टानं ऐकलं तर कदाचित ते काहीतरी शाप देतील! नकोच! त्याला भय वाटलं. सरळ-सरळ योगशिक्षणासाठी गुरूहा म्हणून प्रार्थना केली तर? ते विचारतील, `सगळे ऐहिक सुखोपभोग सोडशील काय? बादशहाच्या दरबारात गाण्यासाठी आलेलं निमंत्रण नाकारण्याइतकी ताकद तुझ्यामध्ये आहे काय?
यावर काय उत्तर द्यायचं?
योगी जी मनाची अवस्था अनुभवतात, त्याच्यापुढे इतर सगळे आनंद फिके आहेत, हे त्यानंही ऐकलं होतं. आता ते आठवताना तो किती तरी वेळ त्यातच तल्लीन झाला. भूक लागली तेहा भानावर आला. जेवताना मनात आलं, पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी निदान भूपालीला तरी घेऊन यायला हवं होतं. जेवण होऊन खोलीकडे येताना स्त्री-देहाची आठवण झाली.
नाही. योगसाधना माझ्यासाठी नाही!
खोलीत येऊन कॉटवर आडवा होईपय|त स्त्री-देहाची आठवणही विरून गेली होती. मनात आलं, या तंबोरा-प्रकरणानंतर सगळ्या पत्रकारांची माझ्यावर नजर आहे. त्यातच हा पुरस्कार. इथं कुणाही विद्यार्थिनीला आणलं असतं, भूपालीसारख्या गोऱ्या मुलीला आणलं असतं तर जास्तच प्रमाणात सगळ्यांच्या नजरेला खुपलं असतं. एकदा त्या दृष्टीनं बातम्या येऊ लागल्या असत्या तर फारच पंचाईत झाली असती. एकटा आलो तेच उत्तम झालं! या विचारानं समाधान वाटलं.
रात्री झोप आली नाही. पुन्हा ओंकार ऐकण्याची आशा! पण हरिदास मंदिराकडे जाणं शक्य नाही. दोन तास तसेच तळमळत काढल्यावर तो नदीच्या काठावर निघाला. देऊळ ओलांडून पुढं गेल्यावर नदीच्या कोरड्या पात्रातल्या वाळूत तो बसला. मनात तंबोरा जुळवून त्यानं स्वरसाधना करायला सुरुवात केली. त्यानं त्या साधूप्रमाणे मंद्र सप्तकातले बारा स्वर म्हटले. त्यानंतर मध्य आणि तार सप्तकातलेही बारा-बारा स्वर घेऊन घोटवून पाहिले. सगळं ओंकारात. सहज जमलं. बरं वाटलं; पण मनात आलं, यानं काय साधणार आहे? मनात येईल त्या सप्तकातला हवा तो स्वर मी एका झटक्यात लावू शकतो. अर्जुनाचा बाण सुटावा तसा स्वर लागतो माझा! तितक्या नेमकेपणानं! राजासाहेबांनी अगदी सुरुवातीलाच सहा महिन्यांत ती तयारी करवून घेतली होती. त्यानंतरही एवढी वर्षे त्याच पद्धतीनं गातोय, सूर लावतोय. मी जो स्वर-विन्यास लीलया करूशकतो, तो त्या साधूला जमणार आहे काय? माझ्याकडून गुरूनं जी संगीत-साधना करवून घेतली आहे, ती त्याच्याकडून घडली आहे काय? पण ते साधू ओंकाराद्वारे संगीत-साधना करत नहते, योगसाधना! त्या विचित्र ओंकार-शक्तीची आठवण झाली. पुन्हा एकदा मंदिरात जायची दुर्दम्य आशा वाटली आणि पाठोपाठ साधूचं बोलणं आठवून तीव्र निराशा झाली. मन असहाय्य भावनेनं घेरलं गेलं.
आणखी दोन दिवस याच अवस्थतेत गेले. एक दिवस मनात आलं, इथं असा उगाच राहून काय साधतोय मी! सहा मौलांवरच्या मथुरेला गेलं तर तिथून थेट मुंबईला जाणार्या गाड्या मिळतील. किंवा दोन तास प्रवास करून दिल्लीला गेलं तर विमानच मिळेल; पण मुंबईला तरी जाऊन काय करायचं? तिथं बरीच पत्रं आली असतील, टेलिग्राम-टेलिफोनही येत असतील. कार्यक्रमाची आमंत्रणं. माझा एक लाख रुपये दर आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यावर कुणी काही वाद घालत नाही. नुकताच तानसेन पुरस्कार मिळालेला असताना कार्यक्रम ठेवायचा उत्साह बर्याच संयोजकांना असतो. हा उत्साह महिन्याभरानंतर ओसरतो. अशा संधीचा फायदा करून घेण्याऐवजी अशा कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी मी येऊन बसलोय! लगोलग सुटकेस घेऊन स्टेशनवर जायचा निश्चयही केला; पण अंथरुणातून उठून विखुरलेले कपडे एकत्र आवरण्याचाही उत्साह नहता. तो तसाच झोपून राहिला.
इथून निघायला पाहिजे हे समजत होतं; पण कुठं जायचं हे मात्र समजत नहतं. त्याच्या मनात एकेक गावांची नावं येऊन गेली; पण कुठल्याही गावाचं आकर्षण टिकलं नाही.
एका क्षणी तीव्रपणे वाटलं, चित्तरपूरला जावं आणि त्या राजासाहेबांच्या जंगलातल्या, नर्मदेकडे तोंड करून असलेल्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे बसून राहावं.
नंतर स्वत:शीच गुणगुणावंसं वाटलं.
दोन तासात तो उठलाच. सामान आवरून बॅग भरली.
उज्जौनीच्या गाडीची चौकशीही न करता तो एक रिक्षा पकडून रेल्वे स्टेशनकडे निघाला.

किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?' "मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!' कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस्. एल्. भैरप्पा
यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!


मूळ लेखक : डॉ. एस.एल. भैरप्पा
अनुवादक : उमा कुलकर्णी

पृष्ठे : 576
किंमत : 400

Saturday, April 2, 2011

लोकल माझी सखी



लोकल्स हा मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य भाग...
मुंबईकरांची रक्तवाहिनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे गालबोट जेव्हा या रक्तवाहिनीला लागते, तेव्हा ती सामान्यांचे दैनंदिन जीवन प्रभावित करते.

लेखक : मधुवंती सप्रे
-------------


मुंबईच्या एस.एन.डी.टी विद्यापीठात पर्यावरणावर झालेल्या चर्चासत्रात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला.
तो होता, मुंबईचा लोकल-प्रवास लोकल प्रवासावर संशोधन करून वाचलेला पेपर.
त्यात म्हटलं होतं की
मुंबईचा लोकल-प्रवास हे संथ मरणाचं सावट आहे.
या एका वाक्याने लेखिका दचकली. कारण तीही रोज लोकलने प्रवास करत होती.
लोकलमध्ये रोज घडणार्या, घाबरवणार्या घटनांची ती साक्षीदार होती.
त्यामुळे संथ मरणाचं सावट या संकल्पनेनं ती मुळापासून हादरली.
मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या महानगरात, सामाजिक, राजकीय अशा बेमुर्वत घटनांनी लोकल-प्रवाशांना बसणारा फटका,
उदा. रेलरोको, बॉम्बस्फोट, आगी लागणे, झोपडपट्टीवाल्यांची दादागिरी, सिग्नल-यंत्रणा ठप्प होणे.
परिणामी चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचायला होणारा उशीर, लेटमार्क होणे वगैरे.
या गोष्टी प्रवाशांच्या आवाक्यातल्या नसतात. यातून वैयक्तिक समस्या निर्माण होतात.
आयुष्याचा समतोल बिघडत जातो.

सत्य घटनांवर आधारित कादंबरी.
पृष्ठे : 176
किंमत : 180